जागतिक दिन 3 डिसेंबर 2019 रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर आणि संवेदना प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद सभागृहामध्ये संपन्न झाला
जागतिक दिन 3 डिसेंबर 2019 रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर आणि संवेदना प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद सभागृहामध्ये संपन्न झाला
जागतिक दिन 3 डिसेंबर 2019 रोजी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर आणि संवेदना प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने दयानंद सभागृहामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करीत असताना लातूर जिल्ह्यात दिव्यांगांसाठी विशेष कार्यक्रम होत आसतात संवेदना संस्था, बुधोडा येथील अंधजन केंद्र, यांचे उल्लेखनीय कार्य आहे. येथे ज्यांचा सत्कार करण्यात आला ते दयानंद पेद्दे त्यांच्या नावाप्रमाणे दिव्यांग असूनही सगळ्यांना ते आनंदीत ठेवतात या गोष्टीचा मला अभिमान आहे, शासकीय कार्यालयांचे जे परिक्षण करण्यात आले त्यामध्ये आमचे कार्यालय खूप मागे आहे हे माझ्या लक्षात आले, पुढील वर्षी मी संपूर्ण इमारत दिव्यांग फ्रेंडली करुन दाखवीन. दिव्यांग मुलांचे शिक्षण हे सामान्य विद्यार्थ्यांसोबत झाले पाहिजे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करने गरजेचे आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी यांनी केले.
या दिनाचे औचित्य साधून लातूरमधील कर्तृत्ववान दिव्यांग व्यक्ती श्री. दयानंद पेद्दे, संचालक, तिरुपती ट्रान्सपोर्ट यांना सन्मानित करण्यात आले. अपघाताने आलेल्या अपंगत्वावर गेल्या 35 वर्षापासून व्हील चेअर वर बसून व्यवसायाला प्रारंभ केले. घरातील भावंडांच्या क्षमतेचा अधिकाधिक उपयोग करुन आज 125 ट्र्कचे ते मालक आहेत. शेकडो सामान्य लोकांना रोजगार मिळवून दिला. ते स्वत: असे मानतात की, मी दिव्यांगच नाही. ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. याकरिता संवेदना प्रकल्पाच्या वतीने श्री. दयानंद पेद्दे यांचा स्मृतीचिन्ह, 5 हजार पुरस्काराची रक्कम, पुस्तक देवून मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी श्री. दयानंद यांनी आणखी 25 हजाराची रक्कम पुरस्कारामध्ये जमा करुन संस्थेस देणगी दिली.
संस्था गटातील पुरस्कार श्री. रामानुज रांदड यांना सन्मानित करण्यात आले. रांदड सर लातूर येथे राजस्थानी विद्यालयात विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून काम करीत असताना स्व. विलासरावजी देशमुख यांच्या संपर्कामुळे 30 वर्षापुर्वी जीवन विकास प्रतिष्ठाणच्या माध्यमातून कर्णबधीर मुलांच्या शिक्षणाचे महत्वाचे काम केले. माहेश्वरी मंडळ, लातूर मधील विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून लातूर मध्ये सामाजिक कार्यात श्री. रांदड सरांचा महत्वपूर्ण सहभाग आहे. याकरिता मान्यवरांच्या हस्ते रांदड सरांना स्मृतीचिन्ह, पुस्तक देवून सन्मानित करण्यात आले. त्यांनी आपली भावना व्यक्त करताना म्हणाले की, 30 वर्षापूर्वी अपंगांच्या बाबतीत जाणीव जागृती मोठ्या प्रमाणात नव्हती घरातील दिव्यांग व्यक्ती घरामध्येच रहायचा त्याच्या शिक्षणाची व्यवस्था अन्यत्र कोठे नव्हती. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कर्णबधीर, मतिमंद मुलांसाठी कार्य करण्याची संधी मला मिळाली.
जिल्हा परिषद, लातूर च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी लातूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातील संपूर्ण दिव्यांगांचे व्यापक सर्व्हेक्षण ग्राम सेवकांमार्फत पुर्ण केले (https://www.sanvedanalatur.com) यामुळे एकाच ठिकाणी सर्व प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींची माहिती मिळायला मदत झाली. याकरिता प्रशासन गटातील दिव्यांगांसाठी उत्कृष्ठ “प्रशासकीय व्यवस्था” हा पुरस्कार संवेदना प्रकल्पाच्या वतीने सन्मानचिन्ह व पुस्तक देवून करण्यात आला. पुरस्कार घेण्यासाठी समाजकल्याण विभागातील श्री. नाईकवडी, समाजकल्याण अधिकारी, श्री. भारत कांबळे, वैसाका, श्री. कुंभार, निरीक्षक, श्री. वाकडे, सहाय्यक सल्लागार, श्री. माळवे, श्री. कांबळे, लिपीक, श्री. जोशी सहाय्यक लेखाधिकारी हे आले होते.
जिल्हा दिव्यांग केंद्राच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये मा. जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्याप्रमाणे लातूर शहरातील अडथळा विरहीत सुलभ शासकीय कार्यालयाची इमारत यांची तपासणी करुन उत्कृष्ठ शासकीय कार्यालयास जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी त्यांना सन्मानित करण्यात यावे असे ठरले होते. त्याप्रमाणे प्रथम क्रमांक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इमारतीला देण्यात आला. या मंडळाचे मा. अध्यक्ष श्री. यादगीरे सर, शिक्षणाधिकारी, श्री. पंचकल्ले सर व इत्तर कर्मचारी वृंद यांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.
व्यासपीठावर रा.स्व.संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष डॉ. रविंद्र साताळकर, नगर, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीरमण लाहोटी, संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष श्री. व्यंकटसिंग चव्हाण, समाजकल्याण अधिकारी श्री. संतोषकुमार नाईकवडी, वैसाका श्री. भारत कांबळे होते. कार्यक्रमाचे आभार सौ. अश्विनी लातूरे यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा. प्रिती पोहेकर व व्यंकट लामजणे यांनी केले. यावेळी संवेदना प्रकल्पाच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले. अंकाचे संपादक प्रा. राजेश्वर बेंबडे यांनी सत्कार मुर्तींचा परिचय करुन दिला.