रुग्ण हा दैवत असतो.रुग्णाचे डॉक्टराने ऐकूण घेणे हाच अर्धा उपचार असतो. पण आज डॉक्टरांना रुग्णांशी बोलायला वेळ नाही आणि हेच रुग्णाचा आजार बळावण्याचे कारण असते. रुग्ण व डॉक्टर नातेसंबंध राहिलेलाच नाही. रुग्ण व डॉक्टर संबंध संघर्षाचे रुप धारण करत आहेत. असे उदगार डॉ. ज्योत्स्ना कुकडे यांनी काढले.
दिव्यांग क्षेत्रातील राष्ट्रीय संघटन सक्षम जिल्हा लातूरच्या वतीने कान, नाक, घसा तज्ञ डॉ. संजय कुलकर्णी लिखीत ‘कुलकर्ण्याचा दवाखाना’ या ललित लेख संग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी त्या बोलत होत्या. हरंगुळ येथील संवेदना सेरेब्रल पाल्सी केंद्रात हा कार्यक्रम संपन्न झाला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या की, संवेदना प्रकल्पामध्ये दिव्यांगांकरिता जे कार्य चालू आहे, ते स्पृहणीय आहे. या विषयावर मला बोलण्याचा अधिकार नाही. या प्रसंगी पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे, प्रसिद्ध साहित्यिका ड़ॉ. निलीमा गुंडी, प्रा. स्नेहल पाठक, डॉ. गिरीश मैंदरकर, डॉ. भातांब्रे, श्री. दिनेश सास्तुरकर, डॉ. बनसोडे, संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष ड़ॉ. राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्राची माहितीपर चित्रफित, प्रयागराज येथील नेत्रकुंभाची चित्रफित प्रदर्शित करण्यात आली. पुस्तक प्रकाशन समारंभाचे प्रास्ताविक डॉ. भगवान देशमुख यांनी केले. त्यांनी सक्षम संघटनेची विस्तृत माहिती दिली. लेखत डॉ. संजय कुलकर्णी, उदगीर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माझ्या वैद्यकीय व्यवसायामध्ये कर्नाटक सिमेवर, ग्रामीण भागातील रुग्णांची भाषा, त्यांच्या गरजा, त्यातून मला आलेले अनुभव हे दै. एकमत मध्ये लिहीत गेलो, त्यातून कुलकर्ण्याचा दवाखाना या पुस्तकाची निर्मिती झाली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.ड़ॉ. प्रिती पोहेकर यांनी केले. सक्षमचे जिल्हा सचिव श्री. दिपक क्षीरसागर यांच्या आभार प्रदर्शनानंतर कल्याण मंत्रानी कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीराम शिंदे, हरिश्चंद्र सुडे, डॉ. शिवाजी काळगे, योगेश्वर बुरांडे, योगेश शेळके, दिपाली गोस्वामी यांचे योगदान राहिले.