जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, संवेदना प्रकल्पाचे कार्य अनुकरणीय मा. जिल्हाधिकारी, लातूर
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, संवेदना प्रकल्पाचे कार्य अनुकरणीय मा. जिल्हाधिकारी, लातूर
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, संवेदना प्रकल्पाचे कार्य अनुकरणीय –
मा. जिल्हाधिकारी, लातूर
आज दि. 4 मार्च 2022 रोजी दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान व संवेदना प्रकल्पाचा वार्षिक अंक विमोचन मा.जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांच्या हस्ते करण्यात आला.
हिमोफिलीया हा बहुरक्तस्राव या त्रासाने अनेक दिव्यांग व्यक्ती व्यथित होत असतात. या स्थितीवर मात करुन श्री. पारस कोचेटा प्रथितयश उद्योजक म्हणून लातूर मध्ये परिचित आहेत. त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार मा.जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. समाजातील वंचित असलेल्या अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह श्री. गजानन बहुद्देशीय संस्था बोरी हे कार्य करीत आहे. त्यामुळे संस्था गटातील पुरस्कार या संस्थेला प्रदान करण्यात आला. दिव्यांग मुलांचे वैद्यकीय प्रमाणपत्र काढण्यासाठी व या विषयाची माहिती विविध पातळीवरती देण्याचे कार्य वैद्यकीय अधिकारी डॉ.माधव शिंदे, जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, लातूर यांनी केलेले आहे. प्रशासकीय गटातील पुरस्कार डॉ. शिंदे यांना जनकल्याण समितीचे संघटनमंत्री श्री. शरदभाऊ खाडिलकर व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे. दिव्यांगजन प्रेरणा स्रोत या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित डॉ. प्रिती पोहेकर यांचा विशेष सन्मान या प्रसंगी करण्यात आला.
हा कार्यक्रम रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचलित संवेदना प्रकल्पाने आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ.राजेश पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प कार्यवाह श्री. सुरेश पाटील यांनी केले. जनकल्याण समिती या संस्थेचे कार्य संपुर्ण महाराष्ट्रात व्यापलेले आहे. आपत्ती काळामध्ये केलेल्या कार्याची माहिती या वेळी विगत करण्यात आली. 2006 साली संवेदना प्रकल्पाची स्थापना करुन दिव्यांग क्षेत्रात विविध उपक्रमांची योजना करण्यात येत आहे. संवेदना प्रकल्पाच्या वतीने जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, 18 वर्षावरील बुद्धीबाधीत दिव्यांग मुलांचे वसतीगृह, पालकांचे निवासी प्रशिक्षण वर्ग दिव्यांग मुलांसाठी संगणक प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्याची स्टेट नोडल एजन्सी सेंटर आदी उपक्रमाची माहिती देण्यात आली. या प्रसंगी लातूर महानगर पालिकेचे मा.आयुक्त श्री. अमन मित्तल यांनी राष्ट्रीय न्यास याची कार्यपद्धती कशी असते हे या कार्यक्रमामध्ये समजली. या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा त्यांनी गौरव केला.
मा. जिल्हाधिकारी यांनी सत्कार मुर्तींचे अभिनंदन केले. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या मार्फत सर्व्हेक्षण, वैद्यकीय शिबीर, बुद्धीबाधीतांसाठी योजिलेल्या राष्ट्रीय न्यासच्या योजना, यु डी आय डी कार्ड काढणे हे महत्वपूर्ण काम झाले आहे. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी लवकरच जागा उपलब्ध करुन देण्याचे अश्वासन त्यांनी यावेळी दिले. संवेदना प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद कार्य असल्याचे त्यांनी सांगीतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. व्यंकट लामजणे यांनी केले तर आभार श्री.डॉ. योगेश निटुरकर यांनी मानले. कार्यक्रमास जनकल्याण समितीचे संघटनमंत्री श्री. शरदभाऊ खाडिलकर, प्रांत उपाध्यक्ष डॉ. रमेशराव जोशी, जिल्हा शल्य चिकीत्सक श्री.डॉ. देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.डॉ. वडगावे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. सुनिल खमितकर, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग श्री. चिकुर्ते, निवासी वैद्यकीय अधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच संवेदना प्रकल्पाचे अँड श्रीराम देशपांडे, श्री. शाम भराडिया, श्री. रत्नदीप बोटवे, श्री. माळवदे, मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील डॉ. भगवान देशमुख, श्री. सुरज बाजुळगे यांच्यासह शिक्षक, पालक, दिव्यांग व्यक्ती, नागरिक यांची उपस्थिती होती.